कणकवली : कणकवली येथील माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी दहावी व बारावी तसेच विविध परीक्षा व कोर्सेसमधील गुणवंतांचे एका प्रसिद्धी पत्राद्वारे अभिनंदन केले आहे. समाजातील व कुटुंबातील व्यक्तिंनी दिलेल्या प्रोत्साहनाचा व अभिनंदनाचा विनम्रपणे स्विकार करुन त्यांनी शैक्षणिक, सामाजिक तसेच कुठलीही संरचना शिकणे ही काळाची गरज असल्याचेही श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे. आपल्याला घडवणारे घटक व तत्वे ह्यांची ओळख घ्यावी असा आग्रह सुद्धा त्यांनी केला आहे.
गुणवंतांनी, आगामी काळात आपण ज्या संस्थेत शिक्षण घेऊ किंवा ज्या आस्थापनात नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करु त्याची संरचना शिकली तर त्यांच्यात सामाजिक स्तरावर आवश्यक असणार्या सोशिक वृत्तीची आपसुक जोपासना होईल असे श्री. पेडणेकर यांनी प्रसिद्धी पत्रात सांगितले आहे.
आपल्या शालेय किवा कौटुंबिक ‘कंफर्ट झोन’ मधून बाहेर पडल्यानंतर, आपले कौशल्य व आपले ज्ञान हे उपयोगात आणण्यासाठी जे ‘प्रोटोकॉल्स’ असतात ते जर कळले नाहीत तर गुणवंतांची कुचंबणा होण्याची शक्यता असते. आपल्यातील कौशल्य, प्राविण्य कधी, कुठे आणि कोणासमोर सादर व्हावे जेणेकरुन आपल्या पालकांनी, आपल्या समाजाने, आपल्या शाळेने व आपल्या गुरुजनांनी आपल्यासाठी दिलेले योगदान सार्थकी लागेल याचे आत्मचिंतन सतत करत रहावे. आपल्या कुठल्याही वाटचालीत आपल्या गुरुजनांचा व आपल्या शैक्षणिक संस्थेचा गुणवंतांना विसर पडताच कामा नये असेही श्री. पेडणेकर यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. आपल्याला थेट परीचयाची नसलेली परंतु समाजाच्या भल्यासाठी सक्रीय व कार्यरत असणारी तत्वे, संस्था व माणसे यांचा आदर करणे सुद्धा अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पुढिल कोर्सेससाठी तथा शिक्षणासाठी ज्या संस्थेत आपण जाणार आहोत तिथली संरचना, प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांच्या वरिष्ठते बद्दल आपण आदराची भावना ठेवून राहीलो तर पुस्तक व सिलॅबस यांच्यासोबतच जीवनावश्यक सकारात्मक युक्तीच्या गोष्टी शिकता येतील. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच गुणवंत व नवयुवक हे त्यांच्या त्यांच्या निवडलेल्या क्षेत्राची संरचना समजून घेऊन वाटचाल करतील आणि स्वतःसह आपल्या कुटुंबाचे, शाळेचे व जिल्ह्याचे नांव रोशन करतील असा विश्वासही माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी प्रसिद्धी पत्रात व्यक्त केला आहे.