विविध सरकारी योजनांचीही करुन दिली माहिती.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, परवा मंगळवारी पाडलोस केणीवाडा येथे शेतकरी विश्वनाथ नाईक यांच्या शेतात जात बांधावर उतरले. यावेळी चिखलात उतरुन चक्क औत हाकण्यापासून भात लावणीतही सहभाग घेतला. शेतातच बसून न्याहारी व पेज जेवण्याचा आनंदही घेतला. तहसीलदारांच्या सक्रिय सहभागा बाबत शेतकर्यांनी त्यांची प्रशंसा केली आहे.
सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील हे आज सकाळी शेतकरी विश्वनाथ नाईक यांच्या शेतात आले. केवळ औपचारिकता न करता ते थेट चिखलात उतरले. बैल जोडीचे औत हाकण्या बरोबरच प्रत्यक्ष भात लावणीतही सहभाग घेतला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना शेतीचे महत्व समजावून सांगितले. तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली. आपल्या मोबाईल मधून ई पीक पाहणी नोंदणी करावी असे आवाहन केले. भात विक्री तसेच नैसर्गिक आपत्तीत भरपाई मिळविण्यासाठी सातबारामध्ये ई- पीक नोंद असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
महसूल विभागाच्या विविध योजनांचीही त्यांनी माहिती दिली. यावेळी शेतकर्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पकपणे उत्तरे देऊन शंका निरसन केले. यावेळी मंडळ अधिकारी पी. एस. सावंत, तलाठी संदिप मुळीक, पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर, उपसरपंच राजू शेटकर, ग्रा. पं. सदस्य काका परब, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश कुबल, आरोस माजी सरपंच शिवाजी परब, पोलीस पाटील रश्मी माधव, शेतकरी विश्वनाथ नाईक, कोतवाल नाना वेंगुर्लेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.