लवकरच या संदर्भात मनसेचा मोर्चाही आयोजीत होणार.
जिल्ह्यातील युवा पिढीने नशामुक्त व सशक्त जीवन जगावे म्हणून मनसे करणार प्रयत्न.
कणकवली | प्रतिनिधी : मनसे राज्य सरचिटणीस व माजी आमदार परशुराम यांनी अंमली पदार्थांना तीव्र विरोध केला आहे. जिल्ह्यातील युवा पिढीने सशक्त व नशामुक्त जीवन जगावे म्हणून मनसे तर्फे मोर्चाद्वारा जागृतीसारखे विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यामध्ये सध्या मोठया प्रमाणात दारू, गुटख्यानंतर आता गांजा, अफू, व्हाईट पावडर, हेरॉईन सारख्या घातक अंमली पदार्थांची छुपी विक्री सुरु झाली आहे. त्यात तरुण तरुणी या अमली पदार्थांच्या आहारी जाऊ लागल्याने भावी पीढी बरबाद होण्याचा धोका आहे. यासाठी पालकांनी आत्ताच सावध होत एकत्रित येऊन या विरोधात पावले उचलण्याची गरज असल्याचे आवाहन मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पालकांना केले आहे.
सिंधुदुर्गात गोवा, कर्नाटक आणि आता मुंबई येथून दोडामार्ग, सावंतवाडी, कणकवली, मालवण, देवगड तालुक्यात छुप्या तथा गुप्त पद्धतीने अशा अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची धक्कादायक चर्चा ऐकू येत आहे. यात काही युवा एजंट एमडी, हेरॉईन सारखी पावडर आणून मालवण सारख्या पर्यटन शहरात विकत आहेत अशी माहितीही ऐकू येत असल्याचे माजी आमदार परशुराम ऊर्फ जिजी उपरकर यांनी सांगितले आहे . त्यातून झटपट व जास्त पैसा मिळू लागल्यामुळे एजंटांचा वावर वाढला आहे तर काही एजंट पाठीला सॅक लावून मोटरसायकलने अशा जीवघेण्या पदार्थांची विक्री करीत आहेत. तर कांही मुंबईस्थित व्यक्ती नियमित सिंधुदुर्गात ये जा करीत या धंद्यात उतरले आहेत अशीही जोरदार चर्चा जनमानसात सुरु आहे असे माजी आमदार परशुराम ऊर्फ जिजी उपरकर यांनी स्पष्ट केले आहे .
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कांही तरुण तरुणी अशा अंमली पदार्थांच्या सेवनामुळे नशेत धुंद होऊन ती न मिळाल्यास आत्महत्या, चोरीमारी सारखे प्रकार करण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या कांही दिवसात तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून ते अशा प्रकारच्या अंमली पदार्थाच्या सेवनाच्या आहारी गेल्याचेही बोलले जात आहे.
म्हणून आपली तरुण मुले मुली अशाप्रकारच्या व्यसनात फसली जाऊ नयेत यासाठी जिल्ह्यातील सर्वं पालकांनी आता जागृत होऊन आवाज उठवला पाहिजे. याबाबत पोलिसांकडून व संबंधीत यंत्रणांकडून कारवाई होण्यासाठी आम्ही मनसेतर्फे लवकरच मोर्च्याचे आयोजन करणार असून त्यामधेही पालकांनी व सर्व सामाजिक संघटनानी सहभागी होऊन जिल्ह्यात वाढू पाहणारी ही अंमली पदार्थांची किड वेळीच ठेचली पाहिजे असे आवाहन मनसेचे राज्य सरचिटणीस व माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.