बांदा | राकेश परब :
भारतीय जनता पार्टी, बांदा यांच्या तर्फे मा.सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना प्रत्यक्ष भेटून धान्य पुरवठा करताना लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी निवेदन देण्यात आले. कोकणातील सर्वात महत्वाचा सण गणेश चतुर्थी हा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणाच्या वेळी धान्य पुरवठा होताना लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेशनिंग दुकानावरील धान्य साठा किमान दहा दिवस अगोदर रेशनधारकाना उपलब्ध करुन द्यावा. त्याचबरोबर देण्यात येणाऱ्या धान्य व तेलाच्या वाटपाच्या प्रमाणात थोडी वाढ करून द्यावी. तसेच रेशनिंग दुकानावरील धान्य साठा आवश्यकतेनुसार उपलब्ध असावा. त्याबाबत आपल्या धान्य पुरवठा विभागाला आपण आवश्यक सूचना द्याव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे भारतीय जनता पार्टी, बांदा यांनी केली.
यावेळी भारतीय जनता पार्टी बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, केदार कणबर्गी, निलेश सावंत आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.