संजय राऊतांचे संकेत; बंडखोर आमदारांना २४ तासात परत येण्याचे आवाहन…
वैभववाडी |प्रतिनिधी – शिवसेनेने महाविकास आघाडीत तून बाहेर पडावे, अशी जर बंडखोर आमदारांची मागणी असेल, तर त्यांनी २४ तासात परत येऊन मुख्यमंत्र्यांकडे आपली अधिकृत भूमिका मांडावी, आम्ही त्यासाठी तयार आहोत, अशी गुगली खासदार संजय राऊत यांनी आज येथे मांडली. दरम्यान शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडण्यास तयार आहे, असेही त्यांनी संकेत दिले आहेत.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. राऊत बोलत होते. ते पुढे म्हणाले, बंडखोरी केलेल्या आमदारांची जर शिवसेनेने भाजपासोबत युती करावी अशी इच्छा असेल, तर ती भूमिका मी नक्कीच स्वीकारु. मात्र त्यांनी पत्रव्यवहार ट्विट किंवा मोबाईलवर संदेश पाठवून आपली भूमिका मांडू नये. त्यांनी २४ तासांच्या आत मुंबईत येऊन आपले म्हणणे मुख्यमंत्र्यांकडे मांडावे, त्यांची मागणी नक्कीच पूर्ण केली जाईल, असे सांगत शिवसेना महाविकास आघाडीची साथ सोडेल, असे नवे संकेत दिले आहेत.