मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बिळवस भोगलेवाडी रस्त्यासाठीची मागणी आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाली.
गेल्या अनेक वर्षांच्या या मागणीला मुख्यमंत्री ग्रामसडक योजना २०१८-१९ अंतर्गत १ कोटी ४५ लाख रु निधी मंजूर झाला होता.
एका ठेकेदाराला सदर कामाचा ठेका मिळाला. ३ वर्षांपूर्वी कामाला सुरवात करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानंतर ३ वर्षे पूर्ण होत आली तरी देखील काम पूर्ण करण्यात आले नव्हते.
याआधी केलेल्या उर्वरित रस्त्याचे काम देखील निकृष्ट दर्जाचे करण्यात आले . मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
१० मे २०२२ पर्यंत बिळवस भोगलेवाडी रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास बिळवस गावातील ग्रामस्थ व मुंबईस्थित चाकरमानी यांना घेऊन रास्ता रोको करून ठेकेदाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मसुरे युवासेना विभागप्रमुख राहुल सावंत यांनी दिला होता.
युवासेनेच्या इशार्यानंतर ठेकेदाराने रस्ता कामाला आता सुरुवात केली आहे.