शिरगांव | संतोष साळसकर (विशेषवृत्त) : महाराष्ट्र राज्यातील पत्रकार या तत्वाचे कष्ट प्रामाणिकपणा,सचोटी आणि ध्यास या तीन घटकांसाठी प्रसिद्ध आहे. समाजातील बर्या वाईट गोष्टींना प्रकाशात आणता आणता त्याचे स्वतःचे असे वैयक्तीक जीवन खूपदा झाकोळले गेलेलेच असते. तो लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो हे सर्वमान्य असले तरी त्याच्या कष्टांची,वेदनांची किंवा निष्ठेची उचित् दखल घेतली जातेच असे नाही. खासकरुन तो पत्रकार छोट्या शहरातील किंवा ग्रामीण भागातील असेल तर त्याच्या कष्टांची कल्पनाही सामान्य माणसांना रोजच्या धकाधकीत लक्षातही येत नाही…कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ नुसताच अदृश्य नसतो तर त्याचे दुर्गम भागातील कष्टही कुठलाच सॅटेलाइट किंवा मोबाईल टाॅवर कव्हर करु शकत नसतो.तरिही तो अतीदुर्गम भागातील सामाजिक,राजकीय ,सांस्कृतिक वगैरे अनेक घटनांना त्याच्या खांद्यावर घेऊन जिथे नेटवर्क आहे तिथपर्यंत घेऊन येत जगाच्या माहिती पटलावर आणून ठेवतो.
तो थकतो,कुंठतो प्रसंगी पोटाला चिमटाही काढतो पण थांबत नाही…!
त्याचे माध्यम कर्तव्य आणि त्याची उपजत समाज बांधिलकी त्याचे इंधन असते. वाचणार्याला किंवा पहाणार्याला अगदी छोटी तथा क्षुल्लक वाटणार्या बातमीमागच्या बाळंतकळा फक्त तो पत्रकारच जाणत असतो…ज्याने त्या बातमीला समाजातून वेचत वेचत एक आकार दिलेला असतो.
या बदल्यात तो भौतिकदृष्ट्या निरपेक्ष असतो…अपेक्षा असते ती फक्त मानाची..उचित् दखल देणगीची….तीही समाजातून.
असेच सच्चे कष्ट काढून पत्रकारिता करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक पत्रकारितेतील नांव म्हणजे दोडामार्गचे रत्नदीप गवस. नावाप्रमाणेच रत्नाचा प्रकाश सोबत राखलेला माणूस आणि आडनांवाप्रमाणे ज्याला सामाजिक बांधिलकीची जाणीव गवसली आहे असा माध्यमकर्मी.
नुकतीच या सर्वाची प्रचिती देणारी एक घटना घडली.
चंदगड येथील श्री.लक्ष्मण राघो गिरो हे दुचाकीने जात असताना त्यांच्या शर्टच्या खिशातील मोबाईल रस्त्याच्या बाजूला पडला होता. पत्रकार रत्नदीप गवस यांना गवसला. त्यांनी तो मूळ मालक लक्ष्मण राघो गिरो रा .चंदगड यांना परत केला .
श्री. लक्ष्मण गिरो आणि त्यांचा मुलगा महेश गिरो हे गोवा डिचोली येथे महेशची एका कंपनी मध्ये मुलाखत होती म्हणून गेले होते. हे दोघे ही आपल्या दुचाकी ने चंदगड येथे जात असताना दोडामार्ग शहरात बँक ऑफ महाराष्ट्र समोरील गतिरोधकाच्या ठिकाणी शर्टच्या खिशातील मोबाईल रस्त्याच्या बाजूला पडला. याच दरम्यान बँकेत आपल्या कामानिमित्त गेलेले पत्रकार रत्नदीप गवस यांच्या तो मोबाईल निदर्शनास आला. त्यांनी तो मोबाईल उचलून कॉलिंग करत तुमचा मोबाईल आपणास मिळाला असल्याचे सांगितले. झरेबांबर येथून ते दोघेजण परत आल्यावर गवस यांनी मोबाईल त्यांच्या कडे सुपूर्द केला. गवस यांनी आपला मोबाईल परत दिल्याने लक्ष्मण गिरो आणि त्यांचा मुलगा महेश तसेच उपस्थितांनी त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल कौतुक केले.
सध्याच्या युगात मोबाईल फोन हा नागरीकाचे संपूर्ण अधिकृत अस्तित्व असतो. अशी विविध स्तरावरील अस्तित्वं जपायची सामाजिक बांधिलकी पत्रकार रत्नदीप गवस यांना गवसली आहे..तिच बांधिलकी सामाजिक स्तरावर सर्वांना गवसली तर रत्नदीपाचा प्रकाश अनेक आयुष्य उजळवून टाकेल अशीच भावना शिकवण या घटनेतून युवावर्गाला गवसेल.