शनिवारी हळवल भाकरवाडी येथे संपन्न झाले शिबीर ; ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे समाधान.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या हळवलच्या भाकरवाडी येथे कळसुली आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वाडी निहाय शिबिरांचे नियोजन करुन ‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यायचा प्रयत्न होत आहे. शनिवारी, १८ नोव्हेंबरला त्याचाच एक उपक्रम संपन्न झाला. सध्या देशभरात पाच लाखांपर्यंत मोफत उपचारासाठी आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डचे वितरण करण्यात येत आहे. यासाठी सामान्य माणसांपर्यंत ह्या योजना पोहोचाव्या यासाठी वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत ‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या लाभार्थ्यांना ते कार्ड अगदी मोफत काढून दिले जात आहे. तसेच ते कार्ड आपल्या असलेल्या पत्त्यावर पोस्टाने देखील पोहोच करण्यात येणार आहे, असे असताना सध्या आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, राशन वितरण दुकान यासह इतर ठिकाणी या कार्डचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात येत आहे.
यावेळी आरोग्यसेवक गंगाधर पाटील, सि. एच. ओ. अश्विनी तावडे, दिप्ती मोंडकर ( परिचारका कर्मचारी ), निलेश ठाकूर ( माजी उपसरपंच ) उपस्थित होते.
यावेळी या शिबिराचा ४० लोकांनी लाभ घेतला तसेच काही नागरिकांनी यापूर्वी आरोग्य केंद्राने राबविलेल्या शिबिरांमध्ये कार्ड काढली असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. तर शिबिरावेळी कोणाला काही आजारपण असल्यास त्याची तपासणी देखील यावेळी करण्यात आली. त्यामुळे नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त करण्यात आले.