देवबागचे ग्रामपंचायतचे माजी बांधकाम सभापती हालेस डिसोजा यांनी जिल्हा नियोजन निधीतून धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातले ‘पर्यटन गांव’ म्हणून आंतरराष्ट्रीय ओळख असलेल्या देवबागला सागरी अतिक्रमणाचा धोका गेली अनेक वर्षे असून यामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. देवबाग किनाऱ्यावर वेंगुर्ला व चिवला बीच, मालवण प्रमाणे संरक्षक धूप प्रतिबंधक बंधारा होणे आवश्यक आहे, देवबाग येथे धूपप्रतिबंधक बंधारा होण्यासाठी जिल्हा नियोजन निधी मधून निधी उपलब्ध करावा, अशी मागणी देवबाग ग्रामपंचायतीचे माजी बांधकाम सभापती हालेस डिसोजा यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देवबागमध्ये पर्यटन दृष्ट्या अद्याप पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या नाहीत. पावसाळ्याच्या चार महिन्यात देवबाग किनारपट्टीला समुद्राच्या उधाणाचा, लाटांचा मारा सहन करावा लागतो. यामुळे देवबाग किनारी वसलेल्या ७५ % घरातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. शासनाकडून पाच ते सहा वर्षांनी काही प्रमाणात किनाऱ्यावर मलमपट्टी केली जाते. मात्र या नैसर्गिक आपत्ती पासून कायमस्वरूपी संरक्षण होणे गरजेचे असून त्यासाठी मजबूत व पक्का संरक्षक धूपप्रतिबंधक बंधारा होणे आवश्यक आहे. मात्र तो अद्याप पर्यंत झालेला नाही. या ठिकाणी यापूर्वी बंधारा बांधण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यासाठी वापरलेला काळा दगड हा कमी वजनाचा असल्याने तो लाटांमुळे विखुरला गेला आहे. या ठिकाणी पक्का बंधारा झाल्यास तो चिरकाळ टिकेल. जीवितहानी टाळण्यासाठी व देवबागचे अस्तित्व टिकविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जातीनिशी लक्ष घालून देवबाग किनाऱ्यावर संरक्षक धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी नियोजन करावे, बंधाऱ्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करावा, अशी मागणी हालेस डिसोजा यांनी निवेदनातून केली आहे.