चौके | ब्युरो न्यूज : चौके नेरुरपार कुडाळ या मार्गावर अनेक खड्डे पडले असून गेले सहा महिने वाहनचालक या भल्यामोठ्या खड्यांमधूनच जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. खड्यांमुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. दरवर्षी गणेश चतुर्थीपुर्वी बांधकाम विभागाचे कर्मचारी थोडेफार खड्डे बुजवतात पण यावर्षी तेही न बुजवल्यामुळे धामापूर ते नेरुरपार दरम्यान काही ठिकाणी एक एक फूट खोल असे धोकादायक खड्डे पडले आहेत. असे असताना ‘सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधीत राजकीय पुढारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत’, असा या मार्गावरून जाणाऱ्यांना व रहिवशांचा आरोप आहे.त्यासाठी धामापूर गावातील युवकांनी पुढाकार घेत स्वखर्चाने आणि श्रमदानातून धामापूर परबवाडी थांबा ते गवळदेव थांबा या दरम्यान मुख्य रस्त्यावर असलेले खड्डे बुजवले त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सदर उपक्रमात महेश परब, प्रशांत परब, दर्शन परब, राज परब, संदेश राऊळ , राजू गावडे, कैवल्य महाजन , शेखर मराठे या तरुणांनी सहभाग घेऊन श्रमदान केले.