बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी बांदा शहरातील आळवाडी मच्छिमार्केट येथे रात्री उशिरा शिरल्याची माहिती मिळताच सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी जातीने बांद्यात धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांना तसेच प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या.
काल मुसळधार पाऊस कोसळल्याने तेरेखोल नदीचे पाणी पात्राच्या बाहेर आले. शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते मच्छिमार्केट रस्ता पाण्याखाली गेला होता. तसेच आळवाडी येथील मच्छिमार्केट परिसरात पुराचे पाणी शिरले. या पार्श्वभूमीवर स्थानिकांना सावध करण्यासाठी तहसीलदार पाटील स्वतः बांदा शहरात आलेत. त्यांनी तब्बल दोन तास याठिकाणी थांबून स्थानिकांना सावधानतेच्या सूचना दिल्यात. तसेच स्थानिक प्रशासनाला देखील अलर्ट राहण्याबाबत सूचना दिल्यात. यावेळी त्यांनी पुरस्थितीची माहिती जाणून घेतली. शहरातील पूर बाधित क्षेत्राची त्यांनी पाहणी केली.
यावेळी बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तलाठी फिरोज़ ख़ान, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, प्रशांत बांदेकर, रुपाली शिरसाट यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी उपस्थित होते.