बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा शहर व परिसरातील पूरबाधित गांवात तत्काळ आपत्ती व्यवस्थापन साहित्य मिळावे यासाठी सावंतवाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष रियाझ़ ख़ान यांनी सावंतवाडी तहसीलदार यांना नुकतेच निवेदन दिले.
बांदा शहर व परिसरातील शेर्ले इन्सुली वाफोली आरोस बाग ही गावे तेरेखोल नदीच्या पूर प्रवण क्षेत्रात येतात. तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी या गांवातील लोकवस्तीत घुसत असल्याने दरवर्षी कोट्यवधी रुपयांची वित्तहानी होते. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने हा परिसर ब्लू झोन म्हणून जाहीर केलेला आहे. मात्र प्रशासनाकडून आपत्कालीन स्थितीत कोणतेही साहित्य अद्याप पर्यंत देण्यात आलेले नाही. काल मंगळवारी रात्री उशिरा बांदा आळवळी परिसरात तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी शिरले मात्र व्यापाऱ्यांना सामान सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी कोणतेही साहित्य उपलब्ध नसल्याने स्थानिकांना त्रास सहन करावा लागला.
बांदा शहरातील पूरबाधित लोकसंख्या ही १७००आहे तर पूरबाधित कुटुंबे हि ८३० आहेत. इन्सुलीतील पूरबाधित कुटुंबे ही ४३० असून बाधित लोकसंख्या एकूण १८०० आहे. शेर्लेतील बाधित कुटुंबे ही ३६ असून लोकसंख्या १०६ आहे. या परिसरातील बाधित लोकसंख्या ही हजारोंच्या घरात असून प्रशासनाने दिलेले आपत्ती व्यवस्थापन चे साहित्य हे तोकडे आहे. बांदा शहर हे केंद्रबिंदू असून प्रशासनाने आणीबाणीच्या काळात संपर्क यंत्रणा बंद होत असल्याने या ठिकाणी सॅटॅलाइट फोन देणे आवश्यक आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी यांत्रिक नौका, लाईफ जॅकेट, मजबूत दोरीचे बंडल, रबरी ट्यूब फायबर बोट, बॅटऱ्या, अत्यावश्यक रुग्णांसाठी स्ट्रेचर, प्राशिक्षित गोताखोर टीम, अत्याधुनिक दुर्बीण, ड्रोन कॅमेरा आदी साहित्य तात्काळ मिळावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी सागर धोत्रे, श्रीकांत धोत्रे, व्यंकटेश ऊरुमकर, भरत धोत्रे, राजा ख़ान आदि उपस्थित होते.