२५ जानेवारीला मालवण तहसीलदारांच्या समक्ष अपघात झाल्याचाही दिला दाखला.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ‘महान- बेळणे-कणकवली’ मार्गावरील ग्रामपंचायत महान कार्यक्षेत्रात वर्दळीच्या अशा महत्वाच्या ठिकाणी गतिरोधक घालण्याची मागणी महान सरपंच अक्षय अजय तावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदना द्वारे केली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होत आहेत. या मार्गावरील प्राथमिक शाळा महान कांदळगाव, साळसकर जनरल स्टोअर्स, गावडे दुकान वरचीवाडी रस्ता, गणेश कुंडाजवळ, हुमरस, माळगांव रस्त्यावर गावडे दुकान आदी महत्वाची ठिकाणे असून या ठिकाणहून गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर खनिज वाहतूक करणारी वाहने मोठ्या भरधाव वेगाने जातात.
२५ जानेवारी रोजी तहसिलदार मालवण यांच्या समक्ष दुचाकी वाहनांचा अपघात झालेला होता. या मालवण बेळणे आता मोठा रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वरील ठिकाणी तातडीने गतिरोधक मंजूर करणेत यावेत व मालवण बेळणे रस्त्याचे काम चालू असून सदर रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदार यांना गतिरोधक करणेकरिता आपल्या स्तरावरून सूचना देणेत याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे सरपंच अक्षय तावडे यांनी केली आहे.