आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांनी पूर्व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केला होता पाठपुरावा.
मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र राज्याचे पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील पहिल्या ५ जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. प्रत्येक घरात नळ जोडणी करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गावांचा सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून केला. सुरुवातीला २०७ कोटी ५४ लाख व त्यानंतर त्यात वाढ करून ४२९ कोटी ६८ लाखाचा आराखडा तयार करून १४ एप्रिल २०२१ रोजी तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्याने तात्काळ जलजीवन मिशन आराखड्याला मंजुरी देण्यात आली. त्या नंतर काही त्रुटींबाबत आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार त्या मार्गी लावण्यात आल्या. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मंजुरी मिळालेल्या जलजीवन मिशनच्या ४२९ कोटीच्या आराखड्यांतर्गत सर्वच्या सर्व ६६५ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ४३१ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. या सर्व गांवातील पिण्याच्या पाण्याची समस्या आता मार्गी लागणार असून सरपंच व ग्रामस्थांनी जलजीवन मिशन योजना व्यवस्थित राबवुन घ्यावी अशा सूचना दिल्या गेल्या आहेत असे सूत्रांकडून समजते.