मानवता विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत यांची मागणी
प्रतिनिधी / मसुरे : सिंधुदुर्ग सह समस्त कोकण वासीयांना उत्सुकता लागून राहिलेले सिंधुदुर्ग विमानतळ येत्या ९ ऑक्टोबर पासून प्रवासी वाहतुकीसाठी चालू होतं आहे. अनेक वर्षे रखडलेला सदर विमानतळ आता चालू होतं आहे ही आनंदाची बाब असली तरी सुद्धा विमानतळासाठी पायाभूत सुविधा अजूनही अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. चिपी येथे पोहोचणारे जोडरस्ते खड्यानी भरून गेले असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत तातडीने आदेश देण्याची मागणी मानवता विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग विमानतळ पूर्णत्वास जाताना अनेक लोकप्रतिनिधी, नेते मंडळी यांचे योगदान लाभले आहे. विमानतळाचे आता उदघाटन होऊन प्रत्यक्ष वाहतूक चालू होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे देश विदेशातील अनेक पर्यटक विमानाने जिल्ह्यात येणार आहेत. परंतु विमानतळावर उतरल्या नंतर त्यांचा प्रवास कष्टप्रद होणार आहे. येथून मालवण, कुडाळ, वेंगुर्ले येथे पोहोचनाऱ्या रस्त्यांची पूर्णपणे वाताहात झाली आहे. मोठमोठे खड्डे या रस्त्यांवर पडल्याने वाहतूक करणे म्हणजे दिव्यच ठरत आहे. वास्तविक पाहता विमानतळ होत असताना पायाभूत सुविधा मधील महत्वाचा ठरणारा रस्ता सुस्थितीत व रुंद होणे आवश्यक होते. परंतु याबाबत योग्य त्या उपाय योजना करताना कुठेतरी कमी पडल्याचे दिसून येत आहे.
मालवणहून विमानतळाकडे जाणारा अप्रोच रस्ता हा अरुंद आणि खड्डेमय असा आहे. आजही या रस्त्याचा प्रश्न मिटलेला नाही तर मालवण , देवगड,कणकवली, वैभववाडी येथील लोकांना चिपी विमानतळाकडे जायचे असेल तर चिपी विमानतळाला दोन ते चार किलोमीटरचा फेरा मारून परुळे येथून जावे लागणार आहे. म्हणजेच हा पैशाचा तसेच वेळेचा अपव्यय होणार आहे. म्हणून विमानतळाकडे जाणारा रस्ता हा मालवणच्या बाजूने थेट असणे गरजेचे आहे तसेच मालवण प्रमाणे कुडाळ येथूनही विमानतळाकडे येणाऱ्या रस्त्याचा प्रश्न हा गंभीर आहे. हे प्रश्न निकाली होणे गरजेचे आहे. पायाभूत सुविधाची जर वानवा असेल तर ते सर्वांच्या दृष्टीने त्रासदायक ठरणारे आहे. ९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उदघाटन कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार असल्याने उदघटनापूर्वी विमानतळाकडे येणाऱ्या रस्त्यांबाबत निर्णय होऊन निधीचा अडसर न येता सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी मानवता विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केली आहे.