संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ व रामेश्वर ग्रामपंचायतने सुनियोजित आयोजन केलेल्या पोखरबाव विहीर स्वच्छता अभियानाची सुरुवात प्रथम गाऱ्हाणे घालुन व नारळ वाढवून करण्यात आली. याठिकाणी राबविलेल्या स्वच्छता अभियानामुळे ऐतिहासिक शिवकालीन पोखरबाव विहीरीने मोकळा श्वास घेतला.
विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे मुख्य सल्लागार राजेंद्र परुळेकर यांनी सुचविलेली नवीन आणि वेगळ्या संकल्पनेला, रामेश्वर ग्रामपंचायतचे सरपंच विनोद सुके यांनी दिलेली तेवढीच तोला-मोलाची साथ तसेच रामेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील उपस्थित ग्रामस्थ, शिवप्रेमी व विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे सदस्य, पदाधिकारी या सर्वांनी मिळून, उत्स्फूर्त प्रतिसादात शिवकालीन (पोखरबाव) विहिर – स्थानिक नाव आपट्यांची बाव व त्या सभोवतालच्या परिसराची साफसफाई करून एक चांगला आदर्श निर्माण केला.
पावसाळ्यात विहीरीच्या चोहोबाजूंनी वाढलेले रान ग्रास कटरने कापुन, झाडा-झुडपे तोडुन, ओला कचरा गोळा करुन ऐतिहासिक विहिर परत प्रकाश झोतात आणण्यासाठी सहकार्य आणि मेहनत घेणाऱ्या रामेश्वर ग्रामपंचायत व ग्रामस्थ, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ गाव व उपस्थित मुंबई कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य, पदाधिकारी, हितचिंतक, ग्रासकटर उपलब्ध करून देणारे जानराव धुळप यांचे मंडळाच्या व रामेश्वर ग्रामपंचायतच्यावतीने आभार मानण्यात आले.
यापुढेही अशाच प्रकारची चांगली कामे एकत्रितपणे करूया असे रामेश्वर ग्रामपंचायतचे सरपंच विनोद सुके यांनी सांगितले. विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष नितिन जावकर म्हणाले एक चांगली ऐतिहासिक वास्तु परत नव्याने उदयास आणुन दिली ह्याचा भविष्यात पर्यटनासाठी फायदा होईल यात शंका नाही.