विश्वचषकाच्या मोहीमेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का..!
सुयोग पंडित | क्रिडा विश्व : ऑस्ट्रेलिया मध्ये आयोजीत आगामी ट्वेंटी-२० क्रिकेट वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली आहे असे सूत्रांकडून समजते.
बि.सि.सि.आय. मार्फत अधिकृत वृत्त दिले नसले तरी पि.टी.आय.वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी सराव सत्रात जसप्रीतच्या पाठीला दुखापत झाली आणि त्याने या सामन्यातून माघार घेतली. पण आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार तो विश्वचषकासाठी अनुपलब्ध असेल असे सूत्रांकडून समजते आहे.
मोहम्मद शमी व दीपक चहर यांची ट्वेंटी-२० संघात राखीव खेळाडू म्हणून निवड केली गेली आहे. आता या दोघांपैकी एकाची मुख्य संघात निवड होऊ शकते. शमी अजूनही कोरोनातून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याची फिटनेस टेस्ट बीसीसीआय घेणार आहे. दीपक चहरने बऱ्याच दिवसांनी मिळालेल्या संधीचं सोनं करताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२०त २ विकेट्स घेतल्या. बुमराहची माघार हा भारताला खूप मोठा धक्का आहे.
आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारताला डेथ ओव्हरमध्ये हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे बुमराहच्या पुनरागमनामुळे भारताला बळ मिळाले होते.
भुवनेश्वर कुमारची चिंताजनक अशी बिघडलेली गोलंदाजीतील लय आणि आता बुमराहची दुखापत अशा दोन समस्या सोबत घेऊन भारताची टी २० विश्वचषक २०२२ मोहीम’ सुरु होणार आहे.