बांदा | राकेश परब :
पाडलोस-केणीवाडा येथे विद्युत वाहिनीच्या दुतर्फा वाढलेली झुडपे तोडताना अचानक वाहिनीने पेट घेतल्याने ग्रामस्थ थोडक्यात बचावले. वायरमन देतो असे सांगूनही अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची दिशाभूल केल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत बांदा कनिष्ठ अभियंता अनिल यादव यांना फोनवरच धारेवर धरले. तसेच उद्या सोमवारी आम्ही तुम्हाला जाब विचारण्यासाठी येत असल्याचा इशारा पाडलोस-केणीवाडा ग्रामस्थांनी दिला.
विद्युत वाहिनी वरील झुडपांची सफाई करण्याचे नियोजन बांदा कनिष्ठ अभियंता अनिल यादव यांना विश्वासात घेऊन करण्यात आले. तसे त्यांनी दोन वायरमन व स्वतः येण्याचे मान्यही केले हाेते असे समीर नाईक यांनी सांगितले. केणीवाडा राममंदिर मार्गावरील अंतर्गत वाहिनी बंद असल्याने झुडपे तोडत असल्यामुळे संपूर्ण वाहिन्या बंद केल्या असल्याची खात्री ग्रामस्थांना झाली व तशा प्रकारे कामही सुरू झाले. परंतु झुडपे तोडताना अचानक वाहिन्यांनी पेट घेतल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली.
ग्रामस्थांनी तात्काळ याची खबर कनिष्ठ अभियंता यादव यांना देत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि याला सर्वस्वी जबाबदार आपणच असल्याचे भाजप पाडलोस बूथ उपाध्यक्ष हर्षद परब व मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक यांनी सांगितले.
हर्षद परब पुढे म्हणाले की, दोन मिनिटांत येणारा वायरमन किंवा अधिकारी दोन तास झाले तरी घटनास्थळी आला नाही. एकीकडे विद्युत वाहिन्यांवरील झुडपे सफाई करण्यासाठी आम्ही आपणास सहकार्य करतो परंतु दुसरीकडे महावितरण विभागाकडून हलगर्जीपणा केला जात आहे. आज झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती झाल्यास खपवून घेणार नसल्याचा इशाराही हर्षद परब यांनी दिला.
कायमस्वरुपी महावितरण कडुन आम्हाला सहकार्य मिळत नाही. विद्युत वाहिनीवरील फरक समजत नसल्यामुळेच आम्ही आपणाजवळ वायरमनची मागणी केली होती तसे तुम्ही देण्याचे आश्वासनही दिले. मात्र काम पूर्णत्वास येईपर्यंत एकही वायरमन घटनास्थळी आला नाही याला काय म्हणावे असा सवाल समीर नाईक यांनी केला.
दरम्यान, यापुढे पाडलोस-केणीवाडा येथील विद्युत वाहिनीवरील झुडपांची सफाई करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा करुच नका असा इशारा सर्व ग्रामस्थांनी महावितरणला दिला.