दिनांक २१ मे २०२२ पासून ते २३ मे २०२२ साजरा होणारा महोत्सव..!
वैभववाडी | नवलराज काळे :
कोकणचे सुपुत्र असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्रालयाचा कारभार हाती घेतल्या दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला झुकते माप दिले आहे. आपल्या जिल्ह्यातील युवावर्गाने वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून आर्थिक प्रगतीला गवसणी घालावी यासाठी त्यांची तळमळ आहे. नोकरीचा ठसा इथल्या जीवनमानावर असल्याने उद्योग करताना योजना प्रस्ताव ते बँक फायनान्सपर्यंत अनेक अडचणी येतात. नेमके काय करायचे याची कल्पना जिल्ह्यातील युवाईला नसल्याची जाणीव राणेसाहेबांना असल्याने सातत्याने त्या दिशेने त्यांनी पाठपुरावा केला आहे. केंद्रीय अधिकाऱ्यांना प्रबोधनाच्या कामगिरीवर नेमले आहे. दिनांक २१ मे २०२२ पासून ते २३ मे २०२२ पर्यंत कणकवली रेल्वे स्टेशन रोडवर भाजपा कार्यालयासमोरच्या विशाल मंडपात होणारा हा महोत्सव त्यादृष्टीने फार महत्वाचा आहे. मनोरंजन नव्हे तर अर्थकारणातून आयुष्य बदलण्याची संधी जिल्ह्यातील तरुण वर्गाला त्यातून मिळणार आहे. यावेळी राजकारण बाजूला ठेवत प्रत्येकाने भेट दिलीच पाहीजे असा हा उपक्रम आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कोकण भागातील उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री यासाठी मार्गदर्शन करणे हा आहे.
विविध कार्यशाळांमधून होतकरू तरुणांसाठी बँक लोन मेळावा, कोकणातील उद्योजकांना सरकारी कंपन्यांसोबत टायअप करण्याची संधी, एक्स्पोर्ट प्रमोशन, उद्यम रजिस्ट्रेशन नोंदणी व झेड कॅम्प, मार्केटिंग व सेल्समनशीप कार्यशाळा, नोंदणी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्वयंरोजगाराचे विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमात मिळणार आहे. थोडक्यात, भविष्यातील परिस्थितीचा वेध घेत नोकरीच्या मानसिकतेतून जिल्ह्यातील युवा वर्गाला बाहेर काढत स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठीचा हा उपक्रम आहे.