आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात उठविला आवाज.
प्रतिनिधी : मागील दहा दिवसांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पडलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी राहत्या घरांमध्ये देखील पाणी जाऊन मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. अशाच प्रकारे कुडाळ तालुक्यातील ओरोस येथील ख्रिश्चनवाडीमध्ये आलेल्या पुरामुळे नऊ घरांमध्ये पाणी शिरले. या ठिकाणी राहत्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे वित्तहानी व राहती घरे कोसळून नुकसान झाले. परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन देखील अद्यापही जिल्हाधिकाऱ्यांनी त्याठिकाणी पाहणी केली नाही अथवा जिल्हा प्रशासनाकडून याची दखल घेतली न गेल्यामुळे या स्थानिक नागरिकांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही असे सांगून, पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार वैभव नाईक यांनी सभागृहाचे लक्ष वेधून कुडाळ तालुक्यातील ओरोस, ख्रिश्चनवाडी येथील नुकसान झालेल्या ९ घरांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.