माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी मालवणला नेहमीच प्राधान्य दिल्याचे मंदार केणी यांनी केले अधोरेखीत…!
मालवण | सुयोग पंडित : मालवण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी, एका प्रसिद्धी पत्राद्वारे लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व माजी खासदार विनायक राऊत यांना मतदान केलेल्या मालवणच्या नागरीकांचे आभार मानले आहेत.
मंदार केणी यांनी आज एका प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकालात, मालवण शहरात १२ कोटी रुपयांचा नगरविकास खात्या अंतर्गत निधी उपलब्ध केला गेला होता. सत्ता असलेल्या काळात जिल्हा नियोजन मधून प्रत्येक वर्षी ६ ते ७ कोटी रुपये मालवण नगरपरिषदेला दिले गेले होते. आमदार निधीतून आमदार वैभव नाईक यांनी शहरला हायमास्ट आणि अन्य विकासकामांना निधी दिला. मालवण शहराच्या विकासाला खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी कायमच प्राधान्य दिले. गेल्या ५ वर्षाच्या काळात मालवण शहरच्या काना कोपर्यातील व चांगले झाले. विविध भागांमध्ये सुशोभिकरणे झाली. स्मशानभूमी, सुसज्ज रस्ते तसेच जे प्रलंबित रस्ते यासाठी जवळपास २० वर्षे जनता मागणी करत होती ते शिवसेनेच्या कार्यकालात पूर्ण झाले. या काळात विकास कामांची नाराजी नागरिकांमध्ये नव्हती. तौक्ते वादळ, कोरोना काळात आमदार वैभव नाईक व माजी खासदार विनायक राऊत यांनी जनतेत उतरुन कामे केली. तौक्ते वादळात १५ दिवसात मालवणचा विज पुरवठा सुरळीत केला गेला असेही मंदार केणी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे अधोरेखीत केले आहे.
या आणि अशा विविध प्रामाणिक कामांच्या पाठिशी राहून मालवणच्या प्रामाणिक नागरीकांनी माजी खासदार विनायक राऊत तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मतदान केले त्यांचे, माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे जाहीर आभार मानले आहेत.