सा. बां. कार्यकारी अभियंता सर्वगौड यांनी त्यांच्या निकृष्ट दर्जाचे खापर नौदलावर फोडायचे पाप केल्याचाही अमित इब्रामपूरकर यांची जळजळीत टीका.
आता ‘त्या’ सरकलेल्या ग्रॅनाईटचे काम नौदल अधिकार्यांनी येऊन करायचे का असाही विचारला उपहासात्मक सवाल.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नूतन पुतळा परिसरातील चौथर्याच्या स्थिती बद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वृत्तपत्र व अन्य माध्यमातून काही खुलासे करण्यात आल्यानंतर मनसेचे ज्येष्ठ नेते अमित इब्रामपूरकर यांनी संताप व्यक्त केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वगौड यांनी वृत्तपत्रातून खुलासा करत किल्ल्याच्या निकृष्ट कामाचे खापर नौदलावर फोडण्याचे पाप केले . जर नौदलाने जर ठरवले असते तर हेलीपॅड अर्ध्या तासात बांधू शकले असते. त्यासाठी अडीच कोटीचा चुराडा त्यांनी केला नसता असे प्रखर मत अमित इब्रामपूरकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहे.
राजकोट किल्ल्याचे काम राज्य शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागानेच केले आहे. पुतळा व त्याच्या चौथर्याचे काम नौदलामार्फत करण्यात आले आहे असा चुकीचा खुलासा केला. नौदलाकडून खुलासा आवश्यक असताना कार्यकारी अभियंता सर्वगौड यांनी खुलासा करून पुन्हा लोकांना उल्लू बनवण्याचे काम सुरूच ठेवले आहे असा आरोप मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे.
घाईगडबडीत केलेल्या या कामात अनेक त्रुटी असून किल्ल्याचे दगड पडल्याचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडील ग्रॅनाईट सरकल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम नौदलाने केल्याचे सांगून नौदलाचे नाव पुढे करत आहे. सरकलेल्या ग्रॅनाइटचे फोटो समाज माध्यमांमध्ये फिरत आहे या ग्रॅनाईटला दुसऱ्या ग्रॅनाईटवर फिटिंग करताना आवश्यक सिमेंटचा थर दिसत नाही. यामुळेच कामाची निकृष्टता सिद्ध होते. अशा प्रकारची निकृष्ट कामे नौदल म्हणजे आर्मी करते असे कार्यकारी अभियंता यांना म्हणायचे आहे का? ते दुरुस्तीचे काम नौदल अधिकारी पुन्हा मालवणात येवुनकरणार का? ९ डिसेंबर च्या वृत्तपत्रांमधून कार्यकारी अभियंता सर्वगौड यांनी बातम्या छापून आणून स्वतःची पाठ थोपटली होती.यात राजकोट किल्ल्याचे काम राज्य शासनाकडे ३६ गुंठे जागा उपलब्ध होती. ही जागा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी तात्काळ राज्य शासनाकडून प्रस्ताव युद्ध पातळीवर मंजूर करून घेऊन ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केली व आवश्यक कार्यवाही केली.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निधीची तरतूद केली. किल्ल्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अवघ्या दोन महिन्यात विक्रमी वेळेत दर्जेदार व उत्कृष्टरित्या पूर्ण केले आहे अशी स्वतःची पाठ थोपटवून घेतली.आता समाज माध्यमांवर निकृष्ट कामाबाबत माहिती फिरत असताना ती कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली नसून नौदलाकडे बोट दाखवून लोकांना पुन्हा उल्लू बनवण्याचे काम कार्यकारी अभियंता सर्वगौड व पालकमंत्र्यांचे सार्वजनिक बांधकाम खाते करत असल्याची टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.
मनसेचे अमित इब्रामपूरकर हे स्वतः अनुभवी स्थापत्य अभियंता आहेत व त्यांनी निरिक्षण करून व्यक्त केलेला संताप हा नक्कीच तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे अशी प्रतिक्रिया काही सामाजिक व राजकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे.