मालवण नगरपरिषद हद्दितील अंगणवाड्यामधील मुलांवर अन्याय होत असल्याची जिल्हाधिकार्यांकडे केली मेलद्वारे तक्रार.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या समाजसेविका व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या तालुका अध्यक्ष सौ.शिल्पा यतीन खोत यांनी मालवण शहरातील नगर पालिका हद्दीतील अंगणवाड्यांमधील मुलांना सरकारी योजनांचा परिपूर्ण लाभ मिळत नाही असे प्रतिपादन केले आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे डिजीटल संदेशाद्वारे तक्रार केली आहे.
महिला बाल विकास विभागामार्फत घेण्यात आलेल्या सुदृढ बालक स्पर्धेतही पालिका हद्दीतील अंगणवाड्यांमधील मुलांना वगळण्यात आले होते. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करुन मालवण नगरपरिषद हद्दीतील सर्व माता व शिशु वर्गातील मुलामुलींना न्याय देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तथा सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शिल्पा खोत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शहरात पालिका हद्दीत जिल्हा परिषद व पालिकेच्या अखत्यारीत अंगणवाड्या आहेत. यात धुरीवाडा तसेच परिसरातील अंगणवाडी मध्ये गेल्या काही वर्षात कोणीही अंगणवाडी सेविका माहिती संकलनासाठी आलेली नाही. गरोदर मातेच्या आरोग्याची चौकशी होत नाही व नवीन जन्माला आलेल्या अपत्याच्या आरोग्याची अधिकृत विचारपूस होत नाही. गरोदर महिलांना शासनाकडून दिला जाणारा कुठलाच लाभ किंवा नवीन अपत्याला मिळणाऱ्या कुठलाच लाभ या भागात अद्यापपर्यंत दिलेला नाही. याबाबत चौकशी केली असता तुमचे क्षेत्र व हे काम आमच्या अखत्यारीत येत नाही असे उत्तर दिले जाते. यात महिला बालविकास विभागामार्फत नुकतीच सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली. यातही शहरातील अंगणवाड्यांमधील मुलांना डावलण्यात आले आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी अंगणवाडी सेविका संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे शहरातील अंगणवाडी मधील मुलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवणाऱ्यांची तसेच विविध स्पर्धांमध्ये डावलण्यात आल्याच्या प्रकाराची चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी सौ. खोत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
मालवण नगरपरिषद हद्द ही पाक तथा नेपाळ मध्ये येते का की ज्यामुळे केंद्र शासनाच्या योजनांचा इथल्या लोकांना वापर होत नाही असा उपरोधक सवाल त्यांनी केला आहे.
आता यासंदर्भात संबंधीत सर्व यंत्रणा व अधिकारी यांचे काय स्पष्टीकरण असेल त्याची प्रतिक्षा असून लवकरात लवकर महिला व बालकांच्या या आरोग्याच्या मुद्द्याची दखल घेतली जावी असे आवाहन सौ.शिल्पा यतीन खोत यांनी केले आहे.