सरपंच सौ.उमदी परब यांनी दिले निवेदन…!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
कांदळगाव, शेमाडराणेवाडी व महान या गावासाठी कायमस्वरुपी तलाठी देण्याची मागणी कांदळगाव सरपंच सौ. उमदी उदय परब यांनी निवेदनाद्वारे मालवण तहसील कार्यालय येथे केली.
कांदळगाव शेमाडराणेवाडी व महान या महसुली गावांना गेली अनेक वर्षे कायमस्वरुपी स्वतंत्र तलाठी उपलब्ध होते.त्यामुळे महसुली गावाचे 7/12 दाखले, उत्पन्न दाखले, वारस तपास व विविध शासकीय योजना कामे सुरळीत पणे होत होती. ग्रामस्थांची कोणतीही कामे खोळंबत नव्हती. परंतु गेली तीन वर्षे इतर तलाठी यांच्यावर सदर सजाचा कार्यभार सोपविण्यात येत असून सदर तलाठी नेमून दिलेल्या दिवशी गावामध्ये नियमित उपलब्ध होत नाहीत. यामुळे गावातील ग्रामस्थांची कामे खोळंबत आहेत. कांदळगाव, शेमाडराणेवाडी व महान या गावासाठी लवकरात लवकर कायमस्वरुपी पूर्वीप्रमाणेच स्वतंत्र तलाठी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी उपसरपंच आनंद आयकर, श्रुतिका कुंभार, राहुल पराडकर,दिनकर सातार्डेकर, भूषण सुर्वे, आदी उपस्थित होते.