लेखन : रोशन चिंचवलकर (पळसंब,सिंधुदुर्ग)
“ए, झिला मुंबैसून कधी ईलं? जातलं कधी? झिल पैसे पाठवतलो हा ! हय रवा नको, पोरगी कोण देतलो?” तळकोकणातील हे तसे परिचीत संवाद आहेत.
इतर कोकणातही कमी अधिक फरकाने हीच परिस्थिती असते.
स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेल्यानंतरही निसर्गसंपन्न कोकणाचा बहुतांश भाग शहरांच्या मनिऑर्डरवर व आजकाल गुगलपे किंवा एन.इ. एफ.टी. वर अवलंबून आहे. कोकण संपन्न असून आर्थिक आत्मनिर्भर बनू शकलेला नाही हे आजपर्यंतचे बहुतांश कटू वास्तव आहे.
खरे तर कोकण म्हणजे प्रत्येक कोकणी माणसाच्या, कोकणाला ज्याने अनुभवले आहे आणि ज्याला फोटो बघून अनुभवायचे आहे, अशा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. तसे कोकण म्हणायला गेले तर बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे. पण त्यात ठाणे आणि बृहन्मुंबई यांचा मानवी जीवनाला अपेक्षित असा विकास झालेला आहे. मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. या शहरांच्या शाश्वत विकासाबाबत अजूनही शंका ही आहेच.
विषय उरतो ग्रामीण बहुल भाग असलेल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा.
निसर्गाचे अलौकिक असे वास्तव्य लाभलेल्या या जिल्ह्यांसमोर विकासाच्या प्रक्रियेतून जाताना मोठे आव्हान आहे. केवळ या कोकणाच्या विकासाबद्दल न बोलता शाश्वत विकासाबाबत आपण सर्वांनी कटिबद्ध असणे गरजेचे आहे.
एखाद्या प्रदेशावर लिहिताना, त्याबद्दल बोलताना, तिथे काम करताना तिथली स्थानिक परिस्थिती, भूगोल, भूतकाळ यांची ढोबळ माहिती असणे आवश्यक आहे. भौगोलिकदृष्ट्या, उत्तरेकडील दमण गंगा नदीपासून दक्षिणेस गंगावल्ली नदीपर्यंतची जमीन कोकण म्हणून मानली जाते. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा विचार करता येथील सागराला मिळणाऱ्या नद्या, डोंगर आणि या नद्या, डोंगरांना बिलगणाऱ्या सागरी लाटा या प्रदेशाच्या सौन्दर्यात अधिकच भर घालतात.
पण, मानवी जीवन शाश्वत रितीने समृद्ध करण्याची ताकद असलेला हा प्रदेश दुर्लक्षित असाच आहे. निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या या प्रदेशातून आजही मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. विशेष करून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांतून मुंबई आणि ठाणे या मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेल्या शहरात नोकरी आणि लग्न अशा कारणांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. कोकणात अशी स्थिती का उद्भवली? याचा सामाजिक आणि आर्थिक अभ्यास करण्याची वेळ आलेली आहे.
आधी सामाजिक स्तरावर आव्हाने सुरु होतात. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई, पुणे अशा शहरांवर कोकणाच्या ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे चालत आलेली आहेत. तेव्हा शहरे ही केवळ उदरनिर्वाहाची जागा होती. आता ती आर्थिक प्रतिष्ठेची जागा होऊन बसली आहे. या दृष्टिकोनाचा परिणाम ग्रामीण भागात विविध स्तरांवर झाला. जसे शिक्षण, विवाह इत्यादी. नोकरी आणि त्यात शहरात घर नसेल तर मुलांचे विवाह होत नाहीत.त्यामुळे शहरांकडे जाणारा वर्ग वाढला आणि ग्रामीण भागातील शाळांचे वर्ग ओस पडू लागलेत. रोजगारासाठी स्थलांतर हा एक भाग झाला. जगाच्या कानाकोपऱ्यात असे स्थलांतर होते.परंतु, एखाद्या प्रदेशाबद्दल असलेल्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे कोकणातील बऱ्याच घरांचे दरवाजे बऱ्याच वेळी बंद असतात हे दुर्दैव आहे. कोकणाचा शाश्वत विकास व्हावा यासाठी मुळात कोकणातील ग्रामीण भागात माणसे राहणे, ती स्थिरावणे गरजेचे आहे. यासाठी कोकणी समाजाच्या मानसिकतेत आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक परिस्थितीत बदल होणे गरजेचे आहे. आर्थिक पर्याय म्हटले तर पश्चिम महाराष्ट्रासारखी सलग जमीन कोकणातील ग्रामीण भागात उपलब्ध नसली तरी गटशेती, सहकाराच्या माध्यमातून शेती व्यवसाय करणे शक्य आहे. आंबा, काजू, फणस, जांभूळ, रातांबा ही कोकणातील हंगामी जरी असली तरी प्रक्रिया करता येणारी फळ आहेत.त्यांचा मोठा आधार असेल. मत्स्योत्पादन, कुक्कुटपालन, शेळीपालन हे शेतीपूरक व्यवसाय पर्याय आहेत. निसर्गसंपन्न असलेल्या या भागात येणारे पर्यटक हा उत्पन्नाचा एक मुख्य स्रोत असू शकतो. गाव पातळीवर होम स्टे उभे करून तिथले पुरुष, महिला यांना रोजगार प्राप्त होऊ शकेल. गेल्या 5 वर्षांच्या काळात इंटरनेटचे जाळे ग्रामीण भागातही पसरायला लागल्याने त्यासंबंधित उत्पन्नाचे मार्ग ग्रामीण स्तरावर उपलब्ध झाले आहेत. जसे शेअर मार्केट, अफीलिएट मार्केटिंग, व्हलॉग, ब्लॉग असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
आपण या अनेक पर्यायांविषयी किती जरी बोललो तरी समाजाची मानसिकता आणि आपले योगदान यावर पुढली परिस्थिती ठरणार आहे. कोकणातील ग्रामीण भागात आपण विकासाचा दरवाजा उघडला तर कोकणातील अनेक दारे आपोआपच उघडणार आहेत. शाश्वत विकासाच्या ओघाने येणारी माणसे इथल्या चांगल्या बदलांचे कारण बनणार आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतः मैदानात उतरून ज्यांना शक्य नाही त्यांनी शक्य होईल तितके योगदान देऊन या विकासाच्या प्रक्रियेत आले पाहिजे. कारण तुमच्या, आमच्या योगदानातून आपल्या जिव्हाळ्याचा असलेला हा कोकण निसर्गसंपन्न आणि मानवी जीवनाला आनंद देणारा ठरणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध असायला हवे.आपली हीच कटिबद्धता मानव आणि निसर्ग यांच्यातील शाश्वत जगण्याचे एक उदाहरण ठरणार आहे. त्यासाठी तुम्हा-आम्हा सारख्या युवा पिढीला दक्ष राहावे लागणार आहे.
तर घेताय ना हे सत्व चॅलेंज…बनताय ना युवा चॅलेंजर. कोकणवासियही व कोकण अभ्यासक दोघांही युवांनी हे चॅलेंज जरुर घ्यावे.