बांदा | राकेश परब : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील बांदा येथील शिवतेज सेवा संस्था व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उद्घाटन कार्यक्रमात बांदा पोलिस निरिक्षक शामराव काळे यांनी रक्तदानविषयक सामाजिक मार्गदर्शन केले.
ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची संधी ही रक्तदान आपल्याला मिळवून देते. समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण सर्वांनी रक्तदान करणे ही काळाची गरज आहे़, एवढेच नव्हे तर एक स्वेच्छा रक्तदाता म्हणून सहभागी होऊन आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला प्रवृत्त करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असे प्रतिपादन बांदा पोलीस निरीक्षक श्यामराव काळे यांनी येथे केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील शिवतेज सेवा संस्था व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी श्री काळे बोलत होते. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात संपन्न झालेल्या या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, रुग्ण कल्याण समिती अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या उन्नती धुरी, श्वेता कोरगावकर, सरपंच अक्रम खान, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, डॉ. मयुरेश पटवर्धन, प्रतिष्ठानचे तालुका सचिव बाबली गवंडे, विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, सावंतवाडी रक्तपेढीच्या डॉ. मसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी रक्तदाते व रक्तमित्रांचा सत्कार करण्यात आला.
प्रकाश तेंडोलकर म्हणाले की, रक्तदान हेच श्रेष्ठदान असे म्हटले जाते आणि ते खरेही आहे़. मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही. रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारेच रक्ताची गरज पूर्ण करण्यात येते. थॅलसिमीया आजाराने ग्रस्त बालकांना, कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना रक्ताची नियमित आवश्यकता असते. कुणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज पडेल हे सांगता येत नाही. आपल्या रक्तदान केलेल्या एका युनिटमधून रक्त व रक्त घटक वेगळे केले जातात. (तांबडया पेशी, रक्तिबबीका (प्लेटलेट्स व प्लाझमा) अशापकारे आपल्या रक्तदानाने १ ते ३ रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे नियमित रक्तदान करा.
यावेळी श्वेता कोरगांवकर, उन्नती धुरी, अक्रम खान, डॉ. जगदीश पाटील, गुरुनाथ सावंत, संजय पिळणकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भूषण सावंत यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तेजस परब, सचिव अनुज बांदेकर, खजिनदार भूषण सावंत, निलेश मोरजकर, जे. डी. पाटील, प्रथमेश राणे, अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, नारायण बांदेकर, अजय आरोस्कर, लक्ष्मण कळंगुटकर, केदार कणबर्गी, दीक्षा गवस आदी उपस्थित होते.
खाकीतील माणुसकी दाखवत बांदा पोलीस निरीक्षक श्यामराव काळे, पोलीस कर्मचारी विजय जाधव, राजू शेळके, योगेश पवार यांनी ऑन ड्युटी असतानाही रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व जपले. यावेळी रक्तदान करण्यासाठी इतरांना देखील प्रवृत्त केले.