मसुरे | प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावची सुकन्या व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या कु. मिताली हर्षिता हरिश्चंद्र परब हिने सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकाउंटंट या परीक्षेमध्ये यश मिळवले आहे . देशपातळीवरील कठीण परीक्षांपैकी ही एक कठीण परीक्षा आहे. मिताली हिने अतिशय मेहनतीने व चिकाटीने हे यश मिळवले आहे.
शैक्षणिक स्तरावर यश मिळवत असताना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून तिने भरतनाट्यम विशारद ही पदवी सुद्धा प्राप्त केलेली आहे. आपल्या यशाबद्दल बोलताना ती म्हणते की अभ्यासात सातत्य आणि प्रयत्न करत राहणे खूपच महत्त्वाचं आहे, हे करण्याची तुमची तयारी असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे कठीण नाही. यावर्षी देशपातळीवर घेतलेल्या चार्टर्ड अकाउंटंट या परीक्षेचा १३. ४४% एवढ्या अल्प टक्केवारीत निकाल लागला असून संपूर्ण देशभरातून केवळ ११,५०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ज्यामध्ये कु. मिताली हिचा समावेश आहे. आंदुर्ले गावचे विधीज्ञ श्री. आनंद रमाकांत परब यांची ती पुतणी आहे. तिच्या या यशाबद्दल समाजातील सर्वच स्तरातून आणि परब परिवार यांच्या मित्र परिवाराकडून तिचे कौतुक होत आहे.